बंद

मा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन

जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्य शासनाच्या सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय साधणारे महत्त्वाचे कार्यालय आहे. महसूल प्रशासन हे सर्व प्रशासकीय विभागांची जननी असून शासनाचा कणा मानला जातो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सदैव कटिबद्ध असते.

नैसर्गिक आपत्ती व टंचाई यांचा फटका सर्वसामान्य जनतेस बसू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, विविध विकासकामे मार्गी लावणे, तसेच शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधणे ही जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसेच लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक व सुरळीत पार पडाव्यात, याची दक्षता घेणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही देखील कार्यालयाची प्रमुख कार्ये आहेत. शासनाचे विविध विभाग व आयुक्त कार्यालयांशी समन्वय राखून विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.

या सर्व कामांची अंमलबजावणी करत असताना शासकीय कामकाजात काही कमतरता आढळल्यास नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील व जिल्हा स्तरावर ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात येते. प्राप्त तक्रारींचे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य प्रकारे निराकरण करण्यात येईल.

सर्व नागरिकांना आवाहन आहे की प्रत्येकाने कायदे व नियमांचे पालन करावे. कायद्याप्रती आदर बाळगणे आवश्यक असून त्यातून सुसंस्कृत व सभ्य समाजाची निर्मिती होते. यासाठी प्रत्येकाच्या मनात कायद्याविषयी तसेच समाजातील प्रत्येक घटकाविषयी आदरभाव विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे.